धाराशिवच्या येडशीत ४० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून. संशयित आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सुरू.
धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरातून ४० वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव संतोष उर्फ दगडू बाबासाहेब देशमुख असे असून ते येडशी येथील रहिवासी होते. ही घटना कुमाळवाडी शिवारातील निर्जन ठिकाणी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या प्रकरणात बार्शी तालुक्यातील बालाजी मिटू पायघान याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, मयताच्या पत्नीशी कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आणि जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सध्या संशयित आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.





