अशोक खरात प्रकरणावरून राज्यात राजकारण तापलं आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
देसाई यांच्या म्हणण्यानुसार, नीलम गोऱ्हे यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी आणि भविष्य जाणून घेण्यासाठी अशोक खरातची भेट घेतली होती.
मात्र, या आरोपांवर आता नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.
“मी अशोक खरातला कधीही भेटले नाही. अशा बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. मी कोणत्याही भोंदू बाबांवर विश्वास ठेवत नाही,” असं गोऱ्हे यांनी ठामपणे सांगितलं.
तसंच, काही असंतुष्ट लोक जाणीवपूर्वक माझी बदनामी करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
दरम्यान, अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले असून SIT कडून तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे
